पनवेल(प्रतिनिधी) माउलींच्या वारी प्रस्थान सोहळ्यानिमित्त १३ जून रोजी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक पंडित उमेश चौधरी यांच्या सुमधूर गायनाचा "अभंग सुमनांजली" थेट प्रक्षेपण कार्यक्रम होणार आहे.
आज संपूर्ण जगावर कोरोना महामारीचे संकट कोसळले आहे. त्या पार्श्वभूमीवर आषाढी पायी दिंडी सोहळा शासनाने रद्द केला आहे. माउलींच्या पालखीचे प्रस्थान ते आषाढी एकादशी अर्थात १३ जून ते ०१ जुलै असे एकूण १९ दिवस महाराष्ट्र्रातील तमाम वारकरी, भक्तांसाठी, वैष्णवांसाठी हे दिवस म्हणजे दीपावली उत्सवच असतो. म्हणून "मल्हार टिव्ही"ने माउली वारीच्या प्रस्थान सोहळ्याची सर्व भक्तांना हरिभजनाची अनुभूती घरबसल्या घेता यावी, या हेतूने महाराष्ट्राचे प्रसिद्ध गायक पंडित उमेश चौधरी यांच्या सुमधूर अभंग गायनाचे थेट प्रक्षेपण शनिवार दिनांक १३ जून रोजी सायंकाळी ०६ वाजता आयोजित केले आहे. त्याचबरोबर "सदगुरु माऊली" या फेसबुक पेजवर तसेच "गाव माझा" या चॅनेललाही याचे त्याचवेळी प्रसारण होणार आहे.
महाराष्ट्र, रायगड जिल्हयाला सांस्कृतिक वरदान लाभलेले आहे. जीवनाच्या विविध क्षेत्रात येथील प्रज्ञावंतानी कर्त्वृत्वाची उत्तुंग शिखरे गाठली आहेत. अफाट सौंदर्याने भरलेली वनश्री जशी रायगड जिल्हयाला लाभली आहे तसेच गंधर्वाच्या गोड गळयातील स्वरश्री देखील इथल्या गायक कलावंताना निसर्गत:च लाभली आहे. त्यातून वारकरी सांप्रदयाची पताका, शास्त्रीय संगीताचा वारसा, सांस्कृतिक कार्य करणारे संगीत सुरमयी व्यक्तिमत्व पंडित उमेश चौधरी यांच्या 'अभंग सुमनांजली' कार्यक्रमाच्या निमित्ताने सुमधूर वाणीचे श्रवणसुख घेता येणार आहे.
या कार्यक्रमासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनीही शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. या कार्यक्रमाचा भक्त मंडळींनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.